पाककडून दारुण पराभवानंतरही कोहलीची खिलाडूवृत्ती
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 05:52 PM (IST)
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या या महामुकाबल्यात कोहलीची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नसली, तरी सामन्यानंतर त्याची खिलाडूवृत्ती अनेकांचं हृदय जिंकून गेली. पाकिस्तान आणि भारत खरंतर क्रिकेटच्या मैदानातले पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी. त्यातच चॅम्पियन्स ट्रॉफी काबीज करण्यासाठी अंतिम फेरीत पोहचल्यामुळे दोन्ही संघांमध्ये टशन असणं स्वाभाविक होतं. त्यामुळे पराभवानंतर टीम इंडिया चरफडत असेल, असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र कोहलीने प्रतिस्पर्ध्यांचं खुल्या मनाने केलेलं अभिनंदन, अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली. 'त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. मी सामन्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं. ते खरंच चांगलं क्रिकेट खेळले. त्यामुळे सामना जिंकणं ते डिझर्व्ह करत होते.' अशी प्रतिक्रिया कोहलीने पाकिस्तानच्या विजयावर दिली. https://twitter.com/ICC/status/876605476317741057 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.