मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुकाणू समितीचा आक्रमकपणा कमी करण्याचा प्रयत्नही सरकारकडून होताना दिसतो आहे. दूध खरेदी दरात प्रति लीटर तीन रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.


गाईच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढा करण्यात आला असून, म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढे करण्यात आला आहे.

पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या खरेदी दरातील वाढीला मान्यता दिला आहे. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्री दरात वाढ केलेली नाही.

विशेष म्हणजे यापुढे महागाई निर्देशांक लक्षात घेऊन राज्यातील दूध खरेदी आणि विक्री दराबाबत प्रदत्त समितीची वर्षातून किमान एकदा बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत दूध खरेदी आणि विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे.