रिओ ऑलिम्पिक (हॉकी): भारताचा अर्जेंटिनावर 2-1नं विजय
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2016 04:10 PM (IST)
रिओ दी जेनेरिओ: भारताच्या पुरुष हॉकी संघानं मंगळवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये साखळी सामन्यात अर्जेटिनावर 2-1 नं विजय मिळवला आहे. 2009नंतर भारताना अर्जेंटिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतानं 1980नंतर प्रथमच ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताकडून चिंगलेनलाना कांगूदजामनं आठव्या मिनिटाला गोल केला तर कोथाजीत सिंहनं 35 व्या मिनिटाला गोल केला. अर्जेटिनाकडून गोंजालो पिलाटनं 49व्या मिनिटाला गोल केला. पण त्यानंतर भारतीय बचावफळीनं अर्जेटिनाला गोल करण्याची एकही संधीही दिली नाही. भारताला दुसऱ्या सामन्यात जर्मनीकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण अर्जेंटिनावर मात करुन भारतानं ऑलिम्पिकमधील घौडदौड कायम ठेवली आहे.