तीन तास बेशुद्ध होते, पण भारताचं कोणीही फिरकलं नाही- धावपटू जैशा
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 04:04 PM (IST)
नवी दिल्लीः रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना दर 2 किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. पण भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं उघड केलं आहे. रिओ ऑलिम्पिकमधून भारतात परतलेली मॅरेथॉन रनर ओ.पी. जैशाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर जैशा बेशुद्ध होऊन खाली कोसळली होती. जैशाला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. पण भारतीय पदाधिकाऱ्यांना तीन तास याविषयी काहीच माहिती नव्हती, असा खुलासा जैशाने केला आहे. प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्हना ही गोष्ट कळल्यानंतर ते चांगलेच भडकले आणि मला भेटण्यासाठी आले. त्याचवेळी त्यांची डॉक्टरांशी बाचाबाची झाली असंही जैशानं म्हटलं आहे. जैशाला महिला मॅरेथॉन स्पर्धेत 89 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.