हरारे: केएल राहुलनं हॅमिल्टन मासाकाझाचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावून वन डे पदार्पणातच शतक साजरं केलं आणि टीम इंडियाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केलं. राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर धोनी ब्रिगेडनं हरारेच्या पहिल्या वन डेत झिम्बाब्वेला तब्बल नऊ विकेट्स राखून लोळवलं.


 

या विजयाबरोबरच भारतानं तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. या लढतीत झिम्बाब्वेनं भारताला विजयासाठी 169 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना सलामीवीर करूण नायर सातच धावांवर माघारी परतल्यानं भारताची अवस्था एक बाद अकरा अशी झाली होती. पण सलामीवीर केएल राहुलनं अंबाती रायुडूच्या साथीनं 162 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला.

 

राहुलनं 115 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावा फटकावल्या. त्यानं यादरम्यान सात चौकार आणि एक षटकार ठोकला. तर रायुडूनं 120 चेंडूंमध्ये पाच चौकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली.

 

दरम्यान, आधी टॉस जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार धोनीचा निर्णय  भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानंही योग्य ठरवला. त्याच्या भेदक माऱ्यानं हरारेच्या पहिल्या वनडेत भारताच्या विजयाचा पाया घातला. बुमरानं 9 षटकं आणि पाच चेंडूंमध्ये दोन निर्धाव आणि 28 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना माघारी धाडलं आणि झिम्बाब्वेला 49 षटकं आणि पाच चेंडूंमध्ये 168 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

भारताच्या बाकीच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी बजावली. धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरननं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. तर अक्षर पटेल आणि नवोदित यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट काढली.