गॉल : भारतीय फलंदाजांनी गॉल कसोटीचा पहिला दिवस गाजवला. सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज 190 धावा आणि त्यानंतर चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी यांच्या जोरावर भारताने पहिल्याच दिवशी 3 बाद 399 धावांचा टप्पा पूर्ण केला.


भारतीय फलंदाजांना रोखण्यात श्रीलंकेचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर अभिनव मुकुंद स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवनने शानदार शतक साजरं करत 190 धावा ठोकल्या. कर्णधार विराट कोहली केवळ 3 धावा करुन माघारी परतला, मात्र अजिंक्य रहाणेने पुजाराला चांगली साथ दिली.

अनेक दिवसांनी कसोटीत पुनरागमन केल्यानंतर शिखर धवनने स्वतःला सिद्ध करणारी खेळी केली. अनेक दिवसांपासून खराब फॉर्मात असल्यामुळे शिखर धवन भारताच्या कसोटी संघातून दूर होता. मात्र दुखापतग्रस्त लोकेश राहुलच्या जागी त्याला संधी देण्यात आली. त्याने या संधीचं सोनं केलं.

दुसरीकडे चेतेश्वर पुजारनेही श्रीलंकेच्या गोलंदाजांना मेटाकुटीला आणलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा नाबाद 144 धावांवर खेळत होता. त्याने 247 चेंडूंचा सामना केला.