विशाखापट्टणम: विशाखापट्टणमच्या पाचव्या वन डेत टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 270 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं 50 षटकांत सहा बाद 269 धावांची मजल मारली.


भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं अर्धशतकं झळकावली. रोहितनं 65 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 70 धावांची खेळी केली. तर विराटनं 76 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 65 धावा केल्या.

रोहित आणि विराटनं दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचली. मग विराटनं धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. धोनीनं 41 धावांची खेळी उभारली. केदार जाधवनंही 37 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी ट्रेण्ट बोल्ट आणि ईश सोढीनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.