मुंबई: मुंबई कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव चारशे धावांवर आटोपला आहे. रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडला 400 धावांवर रोखलं. पहिल्या डावात अश्विननं  6 विकेट्स काढल्या. त्यानं कपिल देवच्या सर्वाधिक 23 वेळा एकाच सामन्यात पाच विकेट्स काढण्याच्या विक्रमाचीही नोंद केली.


- मुरली विजयची शानदार खेळी, अर्धशतक पूर्ण

- भारताला पहिला धक्का, केएल राहुल 24 धावांवर बाद

इंग्लंडकडून जेनिंग्सनं कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं. तर मोईन अली आणि बटलरनंही अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून अश्विन आणि जाडेजाच यशस्वी ठरले. अश्विननं सहा गडी बाद केले तर जाडेजानं 4 बळी मिळवले. या दोघांशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आलं नाही.

दरम्यान, जेनिंग्सनं कसोटी पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. त्यानं 219 चेंडूंतली 112 धावांची खेळी तेरा चौकारांनी सजवली.

जेनिंग्सनं आधी कर्णधार अॅलेस्टर कूकच्या साथीनं 99 धावांची सलामी दिली. त्यानं रूटच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची तर मोईन अलीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली.