India Vs England 3rd Test: लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनने शानदार गोलंदाजी केली. 39 वर्षांचा असूनही अँडरसनने सलग 8 षटकांत 6 धावा देऊन तीन बळी घेतले. आपल्या यशाचे रहस्य उघडताना अँडरसनने सांगितले आहे की तो आजकाल नेटमध्ये खूप कमी गोलंदाजी करतो.


अँडरसनने सामन्यासाठी ऊर्जा वाचवण्याचा मार्ग शोधला आहे. अँडरसनच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडने पहिल्या दिवशी विराट कोहलीच्या टीम इंडियाला फक्त 78 धावांवर ऑलआऊट केले. अँडरसन म्हणाला, "मी जसजसा मोठा होतो तसतसे मला वाटते की मी जिममध्ये अधिक मेहनत करावी. मी नेट्समध्ये कमी बॉलिंग करतो आणि जेव्हा मॅच जास्त महत्त्वाची असते तेव्हा ती मॅचसाठी ठेवण्याचा प्रयत्न करतो.


अँडरसन पुढे म्हणाला, "कसोटी क्रिकेटची सर्वात कठीण परीक्षा म्हणजे स्वत:ला मोठे स्पेल टाकण्यासाठी आणि मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करणे. अशा सामन्यांसाठी, तुम्हाला ऊर्जेची आवश्यकता असते आणि जेव्हा तुम्ही सामन्यात नसता, तेव्हा तुम्हाला ते वाचवण्याचा मार्ग शोधावा लागतो.


इंग्लंडचे शानदार पुनरागमन
लॉर्ड्स कसोटीदरम्यानही जेम्स अँडरसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. जेम्स अँडरसनने लॉर्ड्स कसोटीत पाच बळी घेतले. मात्र, लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात अँडरसन थकलेला दिसला. तो म्हणाला, "लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटी दरम्यान मैदानावरून परतताना थोडी अडचण आली होती. पण मी संघाच्या गरजेनुसार हा बदल केल्याचे समाधान होते."


इंग्लंडच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध लॉर्ड्सच्या पराभवातून पुनरागमन करण्यासाठी स्वतःवर काम केले आहे. स्टार वेगवान गोलंदाज म्हणाला, आम्ही फक्त आमच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आम्ही बाहेर जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि हे सुनिश्चित केले की आमचे लक्ष फक्त चांगले करण्यावर आहे. 


भारत 78 धावांवर सर्वबाद


भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर अक्षरशा नांग्या टाकल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारतीय संघाने आपले शेवटचे 5 फलंदाज फक्त 11 धावांवर गमावले.