रांची : बंगळुरू कसोटीतल्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेली टीम इंडिया आजपासून (गुरुवार) तिसऱ्या कसोटीच्या आव्हानाला सामोरी जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही तिसरी कसोटी रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल.


पुणे आणि बंगळुरूच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर रांचीच्या तिसऱ्या कसोटीतही खेळपट्टीची भूमिका आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू राहील. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्याची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची होती, असा शेरा आपल्या अहवालात दिला होता. त्यापाठोपाठ बंगळुरूची खेळपट्टीही दर्जाहीन असल्याचा शेरा त्यांनी दिला.

या दोन्ही खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रांचीची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरण्याचा अंदाज आहे. यजमान झारखंड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मात्र ही कसोटी पाच दिवस चालेल, या मुद्यावर ठाम आहेत.

विराटच्या फॉर्मबाबत चिंता

रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी अस्त्रांना बंगळुरु कसोटीत गवसलेली लय पाहून टीम इंडियाला नवी उभारी मिळाली असली तरी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हा अजूनही भारतीय संघव्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधल्या चार डावांमध्ये मिळून विराटने केवळ 40 धावा केल्या आहेत. यंदाच्या मोसमात विराट जबरदस्त फॉर्मात होता. पुणे कसोटीआधी त्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये मिळून 1457 धावांचा रतीब घातला होता. पण पुणे कसोटीपासून विराटच्या धावांचा ओघ आटला आणि त्याच्या टीम इंडियाला तब्बल 19 कसोटी सामन्यांनंतर पहिल्यांदा पराभवाची कटू चवही चाखायला लागली.

भारतीय संघाने बंगळुरु कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली असली तरी विराटला दोन्ही डावांत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आलेली नाही. त्यामुळे रांचीत टीम इंडियाला आपल्या कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

रांची कसोटीत मुरली विजयचं पुनरागमन?

विराट कोहलीची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तळपलेली नसली, तरी सलामीच्या लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीय संघाच्या दृष्टीनं समाधानाची बाब आहे. राहुलने चार डावांमध्ये मिळून तीन अर्धशतकांसह 215 धावा केल्या आहेत.

रांची कसोटीतही त्याने भारतीय डावाचा भक्कम पाया घालावा, अशी संघव्यवस्थापनाला अपेक्षा आहे. टीम इंडियाच्या सुदैवाने सलामीवीर मुरली विजय खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून, रांची कसोटीत तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची चिन्हं आहेत.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला बंगळुरू कसोटीत गवसलेला सूर भारताच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी बंगळुरू कसोटीला कलाटणी देणारी ठरली होती. टीम इंडियाला पुजारा आणि रहाणेकडून रांचीतही खंबीर खेळीची अपेक्षा राहील.

ऑस्ट्रेलिया संघात मिचेल मार्शऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी?

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्शला दुखापतीच्या कारणास्तव भारत दौऱ्यातून घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणात असमतोल निर्माण झाला आहे.

स्टार्कच्या अनुपस्थितीत पॅट कमिन्सला संधी देण्यात आली आहे. 2011 साली दक्षिण आफ्रिकेत सात विकेट्स घेऊन पदार्पण करणारा कमिन्स त्यानंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्यात खेळणार आहे.

मिचेल मार्शऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. पण अष्टपैलूच्या त्या जागेसाठी अॅश्टन अॅगर आणि मार्क्स स्टॉईनिसची नावंही चर्चेत आहेत. पण तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया लेग स्पिनर मिचेल स्वेपसनला संधी देते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताचं दुसरं बोट सोलून निघालं आहे. पण त्या दुखापतीवर उपचार घेऊन तो हट्टाने रांचीच्या मैदानात उतरेल.