नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा सतरा सदस्यीय संघ काल (सोमवार) रात्री नवी दिल्लीत जाहीर करण्यात आला.


यावेळी संघात यष्टिरक्षक पार्थिव पटेल आणि हार्दिक पंड्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्तानं भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.

अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेलची निवड करण्यात आली आहे. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकलेलं नाही. तर अश्विन आणि जाडेजा हे संघात कायम आहेत.

दरम्यान, या कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 58 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर बुमराहची कसोटी संघात वर्णी लागली आहे.

दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध खराब फॉर्म असलेल्या अजिंक्य रहाणेचीही निवड झाली असून त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, रिद्धीमान साहा, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या

कसोटी मालिका वेळापत्रक : भारत आणि द. आफ्रिकेमध्ये 5 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान तीन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.

पहिली कसोटी - 5 ते 9 जानेवारी (केप टाऊन)

दुसरी कसोटी - 13 ते 17 जानेवारी (सेंच्युरियन)

तिसरी कसोटी - 24 ते 28 जानेवारी (जोहान्सबर्ग)

यानंतर वनडे आणि टी-20 मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र सध्या कसोटी संघाचीच निवड करण्यात आली आहे.