पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत या कसोटी सामन्यातही फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याला सुरुवात झाली असली तर पावसाचे सावट कायम आहे.


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात दिवसभर पाऊस होण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवसही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची वर्तवली आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना होणार का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही संघासाठी स्वत:चे स्थान बळकट करण्याच्या हेतूने दुसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला आहे.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामान्यात विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार असेल तर आफ्रिकेचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. मात्र, पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे हिरामोड होण्याची शक्यता आहे. पुण्यातील सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण मिळतील.

कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा ५० वा कसोटी सामना ठरला आहे. या यादीत विराटने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.