मुंबई : भारत आणि बांगलादेश संघांमधला कोलकात्याचा दुसरा कसोटी सामना दिवसरात्र खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. भारत-बांगलादेश संघांमधली दुसरी कसोटी 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश संघ पहिल्यांदाच दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार आहेत. पण या कसोटीच्या पूर्वतयारीसाठी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना केवळ दोनच दिवस मिळणार आहेत.


हा भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तसंच भारतात खेळवला जाणारा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामनाही आहे. बांगलादेशचा संघ आज (30 ऑक्टोबर) भारतात पोहचणार आहे. भारत आणि बांगलादेश संघात तीन ट्वेण्टी 20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

विराटनंतर बीसीसीही राजी
भारतीय संघ याआधी दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी तयार नव्हता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दिवस-रात्र कसोटीसाठी कर्णधार विराट कोहलीला राजी केलं होतं. त्यानंतर चेंडू बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कोर्टात गेला. बीसीबीने मंगळवारी (29 ऑक्टोबर) बीसीसीआयचा प्रस्ताव मान्य केला.

डे-नाईट कसोटी क्रिकेटला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत, असं गांगुलीचं मत आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या रांचीमध्ये खेळवलेल्या तिसऱ्या कसोटीनंतर विराट कोहलीने प्रेक्षकांच्या कमी संख्येवरुन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भारतात पाच कसोटी सेंटर बनवण्याचा मुद्दा कोहलीने उपस्थित केला होता.

"ही चांगली सुरुवात आहे. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मी आणि माझ्या टीमने यासाठी बरीच मेहनत केली आहे. आम्ही विराट कोहलीचे आभार मानतो, कारण तो यासाठी तयार झाला," असं सौरव गांगुली म्हणाला.