बंगळुरु : श्रेयस अय्यरच्या भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 246 धावात गुंडाळून दुसऱ्या दिवसअखेर 165 धावांची आघाडी घेतली. बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडिअमवर उभय संघांमध्ये पहिला अनऑफिशिअल कसोटी सामना सुरु आहे.


भारताच्या पहिल्या डावात सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी 277 धावांची मजबूत भागीदारी रचली. दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ 136 आणि मयंक अग्रवाल नाबाद 220 धावांच्या बळावर भारताने 165 धावांची आघाडी घेतली.

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या रवीकुमार समर्थला (37) खेळपट्टीवर फार काळ टिकता आलं नाही. मात्र दुसरीकडे मयंक अग्रवालची दमदार खेळी सुरुच होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर (9) आणि मयंक अग्रवाल खेळत होते. भारताने दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 411 धावा केल्या.

मोहम्मद सिराजचा धमाका

भारताच्या फलंदाजीपूर्वी गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. मोठ्या संघर्षानंतर दक्षिण आफ्रिकेला 246 धावांपर्यंत पोहोचता आलं. भारताच्या एकट्या मोहम्मद सिराजनेच पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर नवदीप सैनी आणि रजनीश गुर्बानी यांनी प्रत्येकी दोन, तर यजुवेंद्र चहलने एक विकेट घेतली.