चेन्नई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात, रवींद्र जाडेजाला धावचीत दिल्याने कर्णधार विराट कोहलीने नाराजी दर्शवली. या निर्णयावरुन दक्षिण आफ्रिकेचे पंच शॉन जॉर्ज यांच्यावर विराटची नाराजी होती. शॉन जॉर्ज यांनी सुरुवातीला रवींद्र जाडेजाला धावचीत दिलं नाही. परंतु विंडीज खेळाडूंच्या विरोधानंतर हे प्रकरण तिसऱ्या पंचांकडे गेलं, यानंतर जाडेजाला बाद ठरवण्यात आलं.


चेन्नईमध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. शिमरॉन हेटमायर आणि शाय होपच्या धडाकेबाज खेळीमुळे विंडीजचा आठ विकेट्सनी विजय झाला. टीम इंडियाने दिलेलं 289 धावांचं आव्हान विंडीजने 13 चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं. हेटमायरने 106 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 139 धावा कुटल्या. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं. हेटमायरने सलामीच्या शाय होपसह दुसऱ्या विकेटसाठी 218 धावांची निर्णायक भागीदारी रचली. होपनेही सातवं वन डे शतक साजरं करताना नाबाद 102 धावांची खेळी उभारली. या विजयासह विंडीजने तीन वन डे सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

INDvsWI | हेटमायर, होपच्या धडाकेबाज खेळीने टीम इंडियाचा विंडीजकडून आठ विकेट्सने पराभव

या सामन्यात भारतीय संघाच्या डावादरम्यान 48 व्या षटकात पंच शॉन जॉर्ज यांनी रवींद्र जाडेजा धावचीत दिलं. एक धाव घेताना क्षेत्ररक्षक रोस्टन चेजने थ्रो केलेला चेंडू दुसऱ्या बाजूला स्टम्पला लागला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जोरदार अपील केलं नाही. मैदानावरील पंच शॉन जॉर्ज यांनीही जाडेजाला बाद ठरवलं नाही. यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर पंचांना धावचीतबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सोपवलं आणि त्यांनी जाडेजाला बाद ठरवलं.

यावेळी मैदानाबाहेर असलेल्या कर्णधार विराट कोहली या संपूर्ण घटनाक्रमावर नाराज दिसला. राग आणि नाराजी दर्शवत तो ड्रेसिंग रुममध्ये गेला. चेंडू डेड झाल्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय कसा काय सोपवला? असा विराटचा आक्षेप होता. रवींद्र जाडेजाने 21 चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.