लंडन: भारत आणि इंग्डंल यांच्यातील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्टपासून टेंटब्रिजमध्ये खेळवण्यात येईल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे.


एकीकडे हा दबाव असताना दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या पाठदुखीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. जर विराट कोहली तिसऱ्या कसोटीत खेळला नाही तर कर्णधारपद कोणाकडे, हा प्रश्न आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. फलंदाजीवेळीही विराटला पाठदुखी होत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे जर विराट तिसऱ्या सामन्यात खेळला नाही, तर कर्णधारपदासाठी पर्याय शोधावा लागेल.

सध्या भारताकडे कर्णधारपदासाठी दोन पर्याय आहेत. सर्वात पहिला पर्याय म्हणजे उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा आहे. कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाची धुरा उपकर्णधाराकडे असते. मात्र सध्याचा रहाणेचा फॉर्म पाहता, विराटच्या जागी कर्णधारपद रहाणेला मिळेल याबाबत शंकाच आहे. शिवाय रहाणेवर अतिरिक्त ओझं देऊन त्याला आणखी दबावात टाकण्याबाबत टीम मॅनेजमेंट साशंक आहे.

रहाणेनंतर अनुभवी खेळाडूंमध्ये केवळ एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आर अश्विनचा. अश्विन कर्णधारपद सांभाळू शकतो, त्याच्याकडे अनुभवही आहे.

अश्विनने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. पंजाबनेही अश्विनच्या नेतृत्त्वात चांगली कामगिरी केली होती.

सध्या अश्विन या मालिकेत तुलनेने चांगली कामगिरी करत आहे. दोन कसोटीत अश्विनने 7 विकेट तर घेतल्याच, शिवाय 85 धावाही केल्या आहेत. अश्विनने केलेल्या धावा या आघाडीचे फलंदाज धवन, मुरली विजय, के एल राहुल, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक यांच्यापेक्षा जास्त आहेत.

संबंधित बातम्या

तिसऱ्या कसोटीतून पुनरागमनासाठी बुमरा सज्ज  

IndvsEng : तिसऱ्या कसोटीतून 'या' तिघांना डच्चू?  

पुढच्या कसोटीत खेळणार की नाही? विराट म्हणतो... 

चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव : विराट कोहली