मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंसमोर 256 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि फिंच या जोडीनं भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या दोघांनी 258 धावांची अभेद्य भागीदारी रचून वैयक्तिक शतकंही झळकावली.

अॅरॉन फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 110 धावा फटकावल्या. तर वॉर्नरनं 112 चेंडूत 17 चौकार आणि तीन षटकारांसह 128 धावांची खेळी साकारली. त्याआधी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा डाव 255 धावांत गुंडाळला होता. शिखर धवन आणि लोकेश राहुलनं केलेल्या शतकी भागिदारीचा टीम इंडियाला लाभ उठवता आला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व आघाड्यांवर टीम इंडियावर वर्चस्व गाजवलं. सामन्यात ऑस्ट्रेलियाने काही विक्रम केले तर काही लाजिरवाने विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाले आहेत.

1. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे की, 250 धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 10 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत होणारा संघ हा आशिया खंडातला आहे.

2. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या जोडीने दुसऱ्यांदा भारताविरोधात द्विशतकी भागिदारी रचली आहे. 2017 मध्ये बंगळुरुमध्ये उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वॉर्नर-फिंच जोडीने 231 धावांची सलामी दिली होती.

3. वॉर्नर-फिंच जोडीने केलेली भागिदारी ही आतापर्यंतच्या इतिहासातील भारताविरुद्ध केलेली सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. ऑस्ट्रेलियन संघाची आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागिदारी ठरली आहे.

4. भारतीय संघ चौथ्यांदा 10 विकेट्सनी पराभूत झाला आहे. तर दुसऱ्यांदा भारताला होम ग्राऊंडवर 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

5. वॉर्नरने त्याच्या कारकिर्दीतलं 18 वं तर फिंचने 16 वं शतक पूर्ण केलं.

6. भारतात खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड मोडण्याची विराट कोहलीला संधी होती, परंतु त्यासाठी आता शुक्रावारच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.

7. वानखेडे स्टेडियमवर भारताने सर्वाधिक (09) एकदिवसीय सामने गमावले आहेत. त्यापाठोपाठ इडन गार्डन्सचा (08) नंबर लागतो.

8. गेल्या चार दशकांपासून प्रत्येक दशकाची टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केली आहे. 1990 साली, 2000 साली, 2010 साली वर्षाच्या आणि दशकाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. भारत काल या दशकातला पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यातदेखील भारताला पराभवाची चव चाखावी लागली आहे.

9. भारताने ऑस्ट्रिल्याविरोधात सलग चार एकदिवसीय सामने गमावले आहेत.

10. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (45) नावावर आहे. काल शतक झळकावून ऑस्ट्रेलियन सलामीवर डेव्हिड वॉर्नर सचिनच्या जवळ पोहोचला आहे. सलामीवीर म्हणून वॉर्नरने आतापर्यंत 43 शतकं झळकावली आहेत.

11. गेल्या वर्षभरात (2019-2020) भारतीय संघ सात वेळा 250 धावांच्या आत ऑल आऊट झाला आहे.

12. डेव्हिड वॉर्नरने काल 5000 धावांचा टप्पा ओलांडला. सर्वाद जलद 5000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने 115 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि विव्ह रिचर्ड्स यांनी ही कामगिरी करण्यासाठी 114 सामने घेतले. हे दोघे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाने अवघ्या 101 सामन्यात 5000 धावा जमवण्याचा विक्रम केला आहे.