नागपूर: नागपूरमधील टी-20 सामन्यात थरारक विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं गोलंदाजांचं खास कौतुक केलं. त्याचवेळी विराट असंही म्हणाला की, 'स्वत:वर विश्वास असणं ही महत्वाची गोष्ट आहे.' भारताच्या 144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला फक्त 139 धावा करता आल्या.


सामन्यानंतर कोहली म्हणाला की, 'या खेळपट्टीवर फटके मारणं कठीण होतं. मी बाद झाल्यानंतर लोकेशला कळलं की, त्याला शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. बुमरा आणि नेहरानं शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे.'

भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहनं शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. इंग्लंडला विजयासाठी आठ धावा हव्या असताना बुमराहनं फक्त दोन धावा दिल्या.

याच विजयासोबत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1नं बरोबरी साधली. एक फेब्रुवारील बंगळुरुत होणारा तिसरा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक ठरणार आहे.