लंडन : ऐन विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. या धक्क्यानंतर भारतीय संघव्यवस्थानाने शिखर धवनच्या दुखापतीबाबत वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं आहे. तरी बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्वचषकासाठी सज्ज राहायला सांगण्यात आलं आहे.


शिखर धवन आता तीन आठवड्यांपर्यंत एकही सामना खेळू शकणार नाही. याचा अर्थ असा की 13 जून रोजी न्यूझीलंड आणि 16 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यांआधी टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे. टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. तो विशिष्ट मुदतीत तंदुरुस्त होणं शक्य नाही, असं लक्षात आलं की, धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंतच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असं सूत्रांच्या माहितीनुसार कळतं आहे.

ICC World Cup 2019 | शिखर धवनला दुखापत, या तीन खेळाडूंपैकी कुणाला संधी? | विश्वचषक माझा | ABP Majha



शिखर धवनच्या दुखापतीवर घाईघाईने निर्णय न घेता धवन इंग्लंडमध्येच थांबेल असा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच धवनला पर्यायी बदली खेळाडू म्हणून भारतातून कोण रवाना होणार याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण धवनच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास ‘स्टॅंड-बाय’ खेळाडू असलेल्या ऋषभ पंतला तयारीत राहण्याच्या सुचना दिलेल्याली माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये नसलेल्यांपैकी अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरच्या नावाची चर्चा आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.