साऊदम्प्टन : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीने टीम इंडियाची खऱ्या अर्थानं लाज राखली. पंरतु महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीने मात्र त्याच्या क्षमतेविषयी करोडो भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित केले आहेत. एका जमान्यात कॅप्टन कूल किंवा जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी धोनीची ओळख होती. परंतु अफगाणिस्तानच्या फिरकी आक्रमणासमोर तोच धोनी भांबावलेला दिसला. संघ खराब स्थितीत असताना केदार जाधवने अर्धशतक केले खरे, परंतु त्यानेदेखील संथगतीने धावा केल्या. त्यामुळे धोनी आणि केदारवर टीका सुरु आहे.


भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याने भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांच्या संथ खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिन म्हणाला की, मधल्या फळीत एम. एस. धोनी आणि केदार जाधवमध्ये चांगली भागिदारी पाहायला मिळाली खरी, परंतु दोघांनी खूपच संथ धावा केल्या. तर भारतीय फलंदाजांनी अफगाणी स्पिनर्सना डोक्यावर बसवल्याचा आरोप माजी क्रिकेटर के. श्रीकांत यांनी केला आहे.

धोनीने या सामन्यात अवघ्या 53.85 च्या स्ट्राईक रेटने 52 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा केल्या. तर केदार जाधवने 3 चौकार आणि एका षटकारासह 68 चेंडूत 52 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने मात्र चांगली फलंदाजी केली. विराटने 63 चेंडूत 67 धावा केल्या. विराट आणि केदारच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफागाणिस्तानसमोर 225 धावांचे आव्हान उभे केले. अखेर भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.

मोहम्मद शमीची हॅटट्रिक

टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद शमीची हॅटट्रिक महत्त्वाची ठरली. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर मोहम्मद नाबी, आफताब आमल आणि मुजीब रेहमानला बाद करत हॅटट्रिक साजरी केली. सामन्यात मोहम्मद शमीने चार तर जसप्रीय बुमराह, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.