मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवणारे भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू आता राजकारणाचं मैदान गाजवण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. 'टाइम्स नाऊ'ने हे वृत्त दिलं आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने असा डाव खेळला आहे, ज्यामुळे विरोधकांना थोडी धास्ती वाटू शकते. पक्षांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचे क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी आगामी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरु शकतात. असं झालं तर भाजपला याचा बंपर फायदा मिळू शकतो.

गौतम गंभीरकडे मीनाक्षी लेखी यांच्याजागी दिल्लीच्या राजेंद्रनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नुकतंच म्हटलं होतं की, "मीनाक्षी लेखींच्या कामावर मतदारसंघातील जनता फार खुश नाहीत. पक्षाने विचार करुन असा निर्णय घेतला आहे की, यंदा मीनाक्षी लेखींना उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवणार नाही. त्यांच्या जागी गौतम गंभीरला नवी दिल्लीतील या जागेवरुन भाजपचा चेहरा म्हणून मैदानात उतरवलं जाईल. गंभीर हा दिल्लीकर असून तो सामाजिक कामांसाठीही ओळखला जातो. त्यामुळे या जागेसाठी गंभीरच सर्वात योग्य पर्याय सिद्ध होऊ शकतो."

तर दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीला झारखंडमध्ये भाजपचा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा विचार आहे. धोनीबाबत बोलताना पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की, "हे दोन्ही खेळाडू केवळ आपापल्या राज्यासाठी नाही तर देशासाठी मोठे नेते आहेत. धोनी सध्या भारतीय वनडे संघाचा सदस्य असून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्वही करत आहे. जेणेकरुन झारखंड आणि दक्षिण भारतात त्याचं फार महत्त्व आहे. जर हे दोन्ही क्रिकेटपटू आमच्या पक्षाचा चेहरा बनले तर आगामी लोकसभा निवडणुकी आम्हाला फारच फायदा होऊ शकतो."