Rinku Singh : वर्ल्डकप फायनलमधील दारुण पराभवाचे दु:ख विसरून आता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या होम टी-20 मालिकेत खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, ज्यात भारताने 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला. टीम इंडियाचा उगवता तारा रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या षटकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दबावाच्या परिस्थितीतही तळाच्या फळीतील फलंदाजांसोबत संयम राखला आणि शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंगची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली, पण येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया कोणत्या शेपमध्ये असेल याचेही गणित जुळले आहे. 


'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' केला! 


रिंकूने आयपीएलमध्ये अडचणीच्या सामन्यात कोलकाताला विजय मिळवून दिला आहे. त्याने पाच चेंडूवर पाच सिक्क मारण्याची सुद्धा किमया केली आहे. ती कामगिरी अपवाद नव्हती, तर गुणवत्ता आहेच हे दाखवणारा सिक्स त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारून विजय मिळवून दिला. वनडे वर्ल्डकपमधील दु:ख विसरून टीम इंडियाने आता 2024 च्या वर्ल्डकप विजयासाठी मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे मधल्या फळीतील प्रश्न सुटल्याचे चित्र आहे. वर्ल्डकपसाठी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंह हा क्रम निश्चित होऊ शकतो. दुसरीकडे टाॅप तीन फलंदाजांमध्ये मोठी चुरस असणार आहे. त्यामुळे टॉप 3 कसे आकार घेतात हे पाहणे मनोरंजक आहे. यामध्ये किंग कोहलीसह, रोहित, गिल, राहुल, इशान, जैस्वाल, ऋतुराज, अय्यर, तिलक वर्माचा समावेश आहे.






दुर्दैवाचा फेरा संजू सॅमसनचा 


लोकेश राहुलने वर्ल्डकपमध्ये अप्रतिम कामगिरी करत विकेटकिंपिगचा मुद्दा निकालात काढून टाकला आहे. रिषभ अपघातग्रस्त झाल्याने जायबंदी आहे, तर ईशान किशन आत बाहेर असा प्रवास सुरु आहे. मात्र, या सर्व चक्रात गुणवत्ता असूनही संजू सॅमसन बाहेर फेकला गेला आहे. देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी आणि संधी मिळाल्यानंतर अवसानघातकी खेळी आणि किंवा करो या मरोच्या स्थितीत संजू सॅमसनची खिचडी झाली आहे. दुर्दैवाने इतरांना अपयशी होऊनही जितक्या संधी वाट्याला आल्या त्या कधीच सॅमसनच्या वाट्याला आल्या नाहीत. त्यामुळे कमनशीबी नशीबाचा सॅमसन ठरला आहे. 






पुढचा एमएस धोनी रिंकू सिंहच्या रूपाने सापडला


दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीने जवळपास 15 वर्षे खालच्या फळीत फलंदाजी करताना अशाच प्रकारची खेळी अनेकदा खेळली आहे आणि आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजयाकडे नेले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या स्टाईलने भूमिका बजावण्यासाठी एकही योग्य खेळाडू सापडला नाही, पण आता कदाचित भारताचा पुढचा एमएस धोनी रिंकू सिंहच्या रूपाने सापडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. यशस्वी जैस्वालने 8 चेंडूत 21 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र चुकीमुळे त्याचा सहकारी फलंदाज रुतुराज गायकवाड चेंडू न खेळता धावबाद झाला.






ईशान आणि सूर्याही चमकले


टीम इंडियाने पहिले 2 विकेट अवघ्या 22 धावांत गमावले, परंतु त्यानंतर सूर्यकुमार यादव (42 चेंडूत 80 धावा) आणि इशान किशन (39 चेंडूत 58 धावा) यांच्यात वेगवान आणि मोठी भागीदारी झाली. सामना ऑस्ट्रेलियाच्या पकडीतून हिरावला गेला, पण तरीही शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताच्या 8 विकेट्स घेत पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाला रिंकू ठाम होता. रिंकूने 14 चेंडूत 22 धावांची खेळी खेळी करत संघाला 19.5 षटकांत विजय मिळवून दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या