नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता कसोटीनंतर वन डे आणि टी ट्वेंटीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. मात्र तो सध्या दोन्हीही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत राहील. पण यानंतर सर्व चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तो म्हणजे धोनीने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला?


धोनीने 2007 ते 2016 या काळात 199 वन डे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं असून यापैकी 110 सामन्यात विजय मिळवता आला तर 74 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. तर त्याने 23 टी ट्वेंटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं असून 15 सामन्यात विजय, 7 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला. धोनी कसोटीसोबतच वन डे मध्येही यशस्वी कर्णधार समजला जातो. तो एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने वर्ल्ड कप आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला आहे.

2019 विश्वचषकाची तयारी?

विशेष म्हणजे धोनीने 199 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं होतं आणि 200 सामन्यांचा विक्रम पूर्ण करण्याच्या मोहात न पडता त्याने कर्णधारपद सोडलं. धोनीने मात्र याबाबत अद्याप कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, मात्र त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार त्याने विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. धोनीची 2019 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे आणि त्याच्या खेळावर परिणाम होऊ नये, म्हणून त्याने कर्णधारपद सोडलं असावं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

खराब कामगिरी कारणीभूत?

दरम्यान काही दिवसांपासून धोनीच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये क्वार्टरफायनल जिंकल्यानंतर धोनीच्या नेतृत्वात भारताने 22 वन डे खेळले, यापैकी 10 सामन्यात विजय मिळाला, तर 12 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानतंर बांगलादेशकडून मालिकेत पराभव पत्करणारा धोनी भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. शिवाय त्याच्याच नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव

ऑस्ट्रेलियाने 2016 मध्ये भारताला 4-1 ने धूळ चारली. जून 2016 मध्ये झिम्बाम्ब्वेविरुद्ध विजय मिळवत धोनीने 20 महिन्यांपासून कायम असलेली पराभवाची मालिका खंडित केली. 2016 मध्ये खेळलेल्या 13 वन डे सामन्यांपैकी 7 सामन्यात विजय मिळाला, तर 6 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पराभव

भारतात झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्येही सेमी फायनलपर्यंत मजल मारुन भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम?

कसोटीत सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अजिंक्य आहे. त्यातच धोनीच्या कर्णधारपदावरुन अनेक काळापासून चर्चा सुरु होती, त्यालाही धोनीने पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे धोनीने वन डे आणि टी ट्वेंटीमधून इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेपूर्वीच कर्णधारपद सोडल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.