दुबई : भारताने दुबईत मास्टर्स कबड्डी स्पर्धेत इराणचा 44-26 ने धुव्वा उडवत विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत भारत आणि इराणसह सहा देशांचा समावेश होता. यात भारतासह इराण, पाकिस्तान, कोरिया, केनिया, अर्जेंटिना हे संघ सहभागी होते.


तीनवेळा विश्वविजेता ठरलेल्या भारताला अंतिम सामन्यात इराणसारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धीला सामोरे जावे लागणार होते. हा सामना एकतर्फी होणार नाही असे सर्वांना वाटत होते. परंतु भारताने इराणला वरचढ होण्याची अजिबात संधी दिली नाही. भारताने मध्यांतरापर्यंत 18-11 अशी आघाडी कायम ठेवली होती.

मध्यांतरानंतर इराणने भारताच्या आघाडीच्या चढाईपटूंना माघारी धाडले. मात्र याचा भारतावर फार काही प्रभाव पडला नाही. भारताच्या मोहित छिल्लर आणि गिरीश एर्नाक या बचावपटूंनी चांगली कामगिरी करत भारताचं आव्हान कायम राखलं. तसेच सामन्यात भारताचा कर्णधार अजय ठाकूरने सर्वाधिक नऊ गुण केले. तर मोनू गोयतने भारताच्या खात्यात सहा गुणांची भर घातली.

भारताच्या विजेत्या संघात महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगा आणि गिरीश एर्नाक यांचाही समावेश होता. या खेळाडूंच्या जोरावर भारताने इराणचा 44-26 ने धुव्वा उडवला.