नवी दिल्ली : कोरोनाला हरवत टीम इंडिया मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. विराट सेना कोरोनाशी अर्धी लढाई देशात लढणार आहे, तर अर्धी विदेशात. टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे. परंतु, या सर्व खेळाडूंच्या दुसऱ्या डोसच्या वेळी ते इंग्लंडमध्ये असणार आहेत. 


टीम इंडिया 18 ते 22 जूनपर्यंत न्यूझीलंड विरोधात टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. तसेच टीम इंडिया चार ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. अशातच टीम इंडियाचा इंग्लंड दौरा लक्षात घेत सर्व खेळाडूंनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, कोविशील्ड ऑक्सफोर्डची लस असून भारतात या लसीचं उत्पादन सीरम इंस्टिट्यूट करत आहे. इंग्लंडमध्ये अॅस्ट्रेजनेका लसीचा डोस दिला जात असून ही लसही ऑक्सफर्डनं तयार केली आहे. तसेच ती कोविशील्डसारखीच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे टीम इंडियाचे क्रिकेटर्स लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेणार आहेत. दोन जून रोजी विराट सेना इंग्लंडला पोहोचणार आहे. लसीकरणानंतर इंग्लंडमध्ये गेल्यावर टीम इंडियाला सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. 


टीम इंडियामध्ये चार सलामीवीर फलंदाजांचा समावेश 


भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि इंग्लंड विरोधातील पाच सामन्यांच्या कोसटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पृथ्वी शॉनं विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी केली होती. तसेच संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल आणि मयंक अग्रवालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 


इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया


विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


WTC Final : टीम इंडियात पुनरागमनासाठी हनुमा विहारी सज्ज; डब्ल्यूटीसी फायनलबाबत केला मोठा दावा