T20 World Cup: 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या 2021 टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरला या संघातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली आहे. संघाची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी अय्यरच्या जागी ईशान देण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.


मुख्य निवडकर्ता म्हणाला, "इशान किशन सलामीवीर म्हणून आणि मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. तो आम्हाला खेळाडू म्हणून अनेक पर्याय देतो. त्याने भारतासाठी सलामी दिली आहे आणि त्या सामन्यात पन्नास धावाही केल्या आहेत. त्याचवेळी, तो मधल्या षटकांमध्ये फिरकी चेंडू खेळण्यासाठीही चांगला खेळाडू आहे.


चेतन शर्मा पुढे म्हणाले, की "तसेच डावखुरा फलंदाज महत्त्वाचा होता. जेव्हा लेगस्पिनर विरोधी संघासाठी गोलंदाजी करत असतो, तेव्हा इशान किशन सारख्या आक्रमक फलंदाजाची भूमिका खूप महत्वाची ठरते. श्रेयसने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. श्रेयसने अलीकडच्या काळात जास्त क्रिकेट खेळला नाही, म्हणून आम्ही त्याला स्टँडबाय म्हणून ठेवले आहे, पण इशान किशनला संघात स्थान मिळाले."


T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, धोनीकडे मोठी जबाबदारी


टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ
टीम इंडिया - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.


स्टँडबाय खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर.         


धोनी मार्गदर्शक असेल
बीसीसीआयने 2021 टी 20 विश्वचषकासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. असे मानले जाते की विश्वचषकासाठी 15 जणांची टीम निवडण्यातही धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.