T20 World Cup 2024 Pitches Rating: टी-20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांनी आयोजित केला होता. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी येथे काही स्पर्धांचे सामने आयोजित करण्यात आले होते. टी-20 विश्वचषकासाठी, न्यूयॉर्कमध्ये एक नवीन तात्पुरते स्टेडियम बांधण्यात आले, ज्याला नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम असे नाव देण्यात आले. मात्र या मैदानाच्या खेळपट्टीवरुन आयसीसीला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. 


नासाऊ काउंटी क्रिकेट (T20 World Cup 2024) स्टेडियममधील खेळपट्ट्यांवर दिग्गजांनी जोरदार टीका केली होती. या मैदानावर एकही उच्च स्कोअर सामना दिसला नाही. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामनाही झाला होता. येथील खेळपट्ट्यांचे ड्रॉप ॲडलेड क्युरेटर डॅमियन हफ यांनी तयार केले होते. मात्र, कोणतीही चाचणी न करता या खेळपट्ट्यांवर सामने घेण्यात आले. खेळपट्ट्यांमध्ये खूप असमान उसळी दिसली, ज्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, येथील खेळपट्टी गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून चांगली ठरली. न्यूयॉर्कच्या आठ सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 107.6 होती.


आयसीसीने दिले धक्कादायक रेटिंग-


आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आयसीसीने खेळपट्टीबाबत रेटिंग जाहीर केले आहे. रंजन मदुगले, डेव्हिड बून, जेफ क्रो आणि रिची रिचर्डसन हे न्यूयॉर्क सामन्यांचे चार पंच होते. भारत विरुद्ध पाकिस्तानसह न्यूयॉर्कच्या खेळपट्ट्यांवर खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यांना 'समाधानकारक' मानांकन मिळाले आहे. तर भारत विरुद्ध आयर्लंडसह येथे झालेल्या दोन सामन्यांना 'असमाधानकारक' रेटिंग मिळाले. याशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील खेळासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरही पंचांनी नापसंती दर्शवली आहे. तर सुपर-8 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याची खेळपट्टी 'समाधानकारक' मानली गेली. तर केवळ अंतिम सामन्याच्या पृष्ठभागाला 'खूप चांगली' असे रेट केले गेले होते. नमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील एकूण 52 सामन्यांपैकी केवळ 3 सामन्यांच्या खेळपट्ट्या 'असमाधानकारक' मानल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळला गेलेला उपांत्य फेरीचा सामना होता जिथे अफगाणिस्तान 56 धावांत सर्वबाद झाला होता. 


टीम इंडियाने पटकावला टी-20 विश्वचषक-


टी-20 विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.


संबंधित बातमी:


एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video