T20 World Cup 2024 Final : टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात भारताचे कोणत्या पाच शिलेदारांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील, हे पाच खेळाडू टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरतील. त्याबाबत पाहूयात.


रोहित शर्मा  - 


भारताचा कर्णधार रोहित शर्मा टी20 विश्वचषकात वेगळ्याच लयीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधात तर रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. उपांत्य सामन्यात रोहित शर्माने शानदार फटकेबाजी केली.  रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात 41 चेंडूत 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्याशिवाय उपांत्य सामन्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक ठोकले होते.  विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा काढणार्‍या फलंदाजात रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 7 सामन्यात 159.16 च्या स्ट्राईक रेटने 248 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर 3 अर्धशतके आहेत. त्याने 13 षटकार आणि 16 चौकार ठोकले आहेत. 


ऋषभ पंत -


दुखापतीनंतर ऋषभ पंत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात कमबॅक केलेय. विकेटच्या मागे करिष्मा दाखवणाऱ्या पंतने फलंदाजीतही आपली दबदबा राखलाय. पाकिस्तानविरोधात पंतने खेळलेली इनिंग सर्वांना आठवत असेलच.. पण त्याशिवाय इतर सामन्यातही त्यानं आपलं मोलाचं योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कऱणाऱ्या पंतने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पंतच्या नावावर एकही अर्धशतक नाही, पण रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर आहेत. पंतने सात सामन्यात 34 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 चौकार आणि सहा षटकाराचा समावेश आहे. इंग्लंडविरोधात पंतची खेळी निर्णायक ठरेल, यात शंकाच नाही. 


हार्दिक पांड्या 


हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाचं संतुलन अधिक वाढते. हार्दिक पांड्या गोलंदाजीत चार षटकं फेकतोयच, त्याशिवाय फलंदाजी करताना अखेरच्या षटकात फटकेबाजी करतो. हार्दिक पांड्याला 5 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, त्यामध्ये त्याने 140 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय. त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे. हार्दिक पांड्याने 145 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. त्याने 11 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहेत. 


गोलंदाजीतही हार्दिक पांड्याने आपली कामगिरी चोख बजावली आहे. हार्दिक पांड्याने सात सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. 27 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक पांड्याने प्रतिषटक 7.47 धावा खर्च केल्या आहेत. 


जसप्रीत बुमराह -


सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात भलेही जसप्रीत बुमराहचे नाव नसेल, पण त्याचा इम्पॅक्ट प्रचंड आहे. पॉवरप्ले अथवा डेथ षटके असो.. बुमराहने भेदक मारा केला. भारताला जेव्हा जेव्हा विकेटची गरज असते, तेव्हा तेव्हा बुमराह यश मिळवून देतोय. बुमराहने 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत, त्याचा इकॉनॉमी फक्त 4 इतका राहिलाय.  बुमराहने आतापर्यंत 27 षटकं गोलंदाजी केली, प्रत्येक आठव्या चेंडूवर बुमराह विकेट घेतोय. 


कुलदीप यादव  - 


टी20 विश्वचषकात रोहित शर्माचा हुकमी एक्क ठरला तो म्हणजे कुलदीप यादव... साखळी सामन्यात कुलदीप यादव संघाबाहेर होता. पण सुपर 8 मध्ये त्याला संधी मिळाली. त्याचं त्यानं सोनं केले. कुलदीप यादवने 4 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. प्रत्येक 10 व्या चेंडूवर कुलदीप विकेट घेतोय.