Pakistan T20 World Cup 2024 : बाबर आझमच्या पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानला सुपर 8 मध्येही स्थान मिळवता आले नाही. विश्वचषकात बाबरच्या संघाने लाजीरवाणी कामिगिरी केली आहे. नवख्या अमेरिका संघानेही पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान संघावर टीकेची झोड उडत आहे. आता पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान संघामध्ये सर्वकाही ठीक नाही. कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या दोघांमध्ये बिनसलं आहे. दोघे एकमेकांशी बोलत नाही. दोन्ही खेळाडूंकडून अद्याप यावर अधिकृत कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. 


विश्वचषक 2024 आधीपासूनच पाकिस्तान संघामध्ये ड्रामा सुरु आहे. वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझम याला कर्णधारपदावरुन हटवलं होतं. शाहीन आफ्रिदीकडे संघाची धुरा सोपवली होती. पण टी20 विश्वचषकाआधी पुन्हा एकदा पाकिस्तान संघामध्ये नेतृत्व बदल कऱण्यात आला. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. यावरुन दोघांमध्ये आधीच मतभेद सुरु होते. त्यात विश्वचषकात संघाची खराब कामगिरी झाली. त्यामुळे दोन्ही संघातील दुरावा आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आणि शाहीनमध्ये मोठा वाद सुरू आहे. हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत.  


पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये सुरु असलेल्या या वादावर माजी क्रिकेटर वसीम आक्रम याने प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, वसीम आक्रम म्हणाला की, "पाकिस्तान संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांना एकमेकांशी बोलायचेही नाही. तुम्ही देशासाठी खेळत आहात." वसीम आक्रमने बाबर आणि शाहीनकडे बोट दाखवले होते. संघातील विभागणीबाबत त्यांनी आणखी आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या.






बाबर आणि शाहीन यांच्यातील वादाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या दोघांसोबतच पाकिस्तान संघात आणखी एका खेळाडूकडून गटबाजी केली जात  असल्याचे वृत्त आहे.  याबाबत मोहम्मद रिझवानचे नाव पुढे आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत पीसीबीकडून पाकिस्तान संघाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी - 


अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने फक्त कॅनडाविरोधात विजय मिळवला. त्यांचा आज साखळी फेरीतील अखेरचा सामना आयर्लंडविरोधात आहे. हा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने पाकिस्तान उतरेल.