Shreyas Iyer Mumbai Ranji Trophy 2024-25 : भारतात देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. ज्यामध्ये अनेक ज्येष्ठ खेळाडू आणि युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत. दरम्यान, गतविजेता मुंबईचा संघ अडचणीत दिसत आहे. युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला तिसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले. आता बातमी येत आहे की, श्रेयस अय्यर हे बाहेर जाऊ शकतो.


भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये मुंबईकडून खेळत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात अय्यरने 142 धावांची शानदार खेळी केली होती. या शानदार खेळीनंतरही अय्यर पुढील रणजी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारताच्या कसोटी संघात संधी मिळण्यासाठी झगडणारा अय्यर आता रणजी ट्रॉफीतूनही बाहेर जाऊ शकतो. 


मुंबईला रणजी ट्रॉफीचा पुढचा सामना त्रिपुराविरुद्ध खेळायचा आहे, जो 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अय्यर विश्रांतीमुळे त्रिपुराविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. अय्यर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत टीम इंडियासाठी दिसला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने भारतासाठी शेवटची कसोटी खेळली असली तरी यानंतर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली आहे, पण अय्यर या दोन्ही मालिकेत टीम इंडियात संधी मिळाली नाही.


अय्यर गेल्या काही दिवसांपासून सतत क्रिकेट खेळत आहेत. अशा स्थितीत त्याला विश्रांतीची गरज आहे. अय्यरने सलग 7 बहु-दिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात बुची बाबू स्पर्धेचे दोन सामने, दुलीप ट्रॉफीचे तीन सामने आणि रणजी ट्रॉफीचे दोन सामने समाविष्ट आहेत.


अहवालात बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, अय्यरला किमान एक आठवडा विश्रांती घेण्याची गरज आहे. त्यामुळे तो त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात भाग घेणार नाही. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप अय्यरच्या बदलीची घोषणा केलेली नाही. त्याचवेळी अय्यर यांच्या बाहेर पडल्याची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही.


काही दिवसआधी अय्यर म्हणाला होता की, अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यास उत्सुक आहे आणि म्हणूनच मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. नाहीतर मी काही कारण सांगून बाहेर बसलो असतो. दीर्घ फॉरमॅटमध्ये मी माझ्या भावनांकडे लक्ष दिले आणि गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत. पण मी सध्या चांगल्या ठिकाणी आहे. मला जे करायचे आहे ते मी करत आहे.


अय्यरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द


अय्यरने भारतीय संघासाठी 14 कसोटी सामने खेळले असून 24 डावात 811 धावा केल्या आहेत, 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या श्रेयसला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. जर आपण त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्याने 78 सामन्यांमध्ये 14 शतके झळकावत 6055 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा -


Prithvi Shaw : टीम इंडियानंतर मुंबई संघातून हकालपट्टी झालेल्या पृथ्वी शॉची कमाई किती? कुठून अन् कसा कमावतो पैसे? जाणून घ्या संपत्ती