India v New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे.. अशातच जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक 364 इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जयपूरमधील टी-20 सामन्यावर परश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंडचा संघ यूएईतून भारतात दाखल झालाय. तर जयपूरमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात  भारतीय संघानं सराव सुरु केलाय.


युएईमधील विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय संघाला साखळी फेरतीच गाशा गुंडाळावा लागला. 11 महिन्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये पुढील टी20 विश्वचषक होणार आहे. त्याची बांधणी कऱण्यास भारतीय संघानं सुरुवात केली आहे. विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपलं आहे. त्याशिवाय रवी शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक पदाची सुत्रे स्विकारली आहेत. विश्वचषकात न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केला होता. याचा वचवा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. दरम्यान आठ वर्षानंतर जयपूरमध्ये आतंरराष्ट्रीय सामना होत आहे. त्यात दूषित हवामानामुळे सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याआधीही दोन वेळा भारतात प्रदुषित हवामानाचा सामना क्रिकेटला करावा लागला होता. 2017 मध्ये दिल्लीत भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. तर  2019 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील खेळाडूंना मास्क घालून सराव करावा लागला होता. उद्या होणाऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक :
टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी आलाय.  17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. 17 तारखेला जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 तारखेला रांचीमध्ये दुसरा तर कोलकातामध्ये तिसरा टी-20 सामना होणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे.  


भारताचा टी20 संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव , ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज