Pakistan end campaign Women's World Cup 2025 : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 आता आपल्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. 26 ऑक्टोबर रोजी लीग स्टेजचे सामने संपतील आणि त्यानंतर सेमीफायनल तसेच अंतिम सामना खेळला जाणार आहे. या वेळच्या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही ठिकाणी सामने पार पडले. या सर्व संघांपैकी पाकिस्तानी महिला संघच एकमेव असा ठरला आहे, ज्याला एकही सामना जिंकता आला नाही. बाकीच्या सर्व संघांनी किमान एक विजय नोंदवला आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या महिला संघाचे मैदानावरील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक आणि लाजिरवाणे ठरले.

Continues below advertisement

7 सामने खेळले, 4 पराभव, 3 रद्द

पाकिस्तानी महिला संघाने 2025 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत लीग टप्प्यात एकूण 7 सामने खेळले, त्यापैकी 4 सामने गमावले. पाकिस्तानी महिला संघाने बांगलादेश, भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध आपले सामने गमावले. बांगलादेशकडून त्यांचा 7 विकेट्सने पराभव झाला, तर भारतीय महिला संघाविरुद्ध 88 धावांनी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 107 धावांनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध 150 धावांनी पराभव पत्करावा लागला. याशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाले. संघाच्या प्रदर्शनावरून पाहता, हे सामने खेळले गेले असते तरी विजयाची शक्यता अत्यंत कमी होती, अशी तज्ज्ञांची मते आहेत.

Continues below advertisement

रद्द सामन्यांतून मिळालेल्या गुणांवर सातव्या क्रमांकावर

वर्ल्ड कपदरम्यान श्रीलंकेत झालेल्या सामन्यांवर पावसाचा मोठा परिणाम झाला. तेथे झालेल्या 11 पैकी 5 सामने रद्द झाले, तर काही सामन्यांत षटकांची कपात करण्यात आली. पाकिस्तानला त्यांच्या तीन रद्द सामन्यांमधून प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे संघाच्या नावावर एकूण तीन गुण जमा झाले आणि ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले.

सध्या आठव्या क्रमांकावर बांगलादेश आहे, ज्याच्या नावावर दोन गुण आहेत. त्यांचा शेवटचा सामना भारतीय महिला संघाविरुद्ध आहे, आणि त्यात विजय मिळवणं बांगलादेशसाठीही जवळपास अशक्य दिसतं. त्यामुळे पाकिस्तानचं सातवं स्थान कायम राहण्याचीच शक्यता आहे.

लाजिरवाणा शेवट, चाहत्यांचा हिरमोड 

एकेकाळी स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारा पाकिस्तानी महिला संघ या वेळच्या वर्ल्ड कपमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. ना दमदार फलंदाजी, ना परिणामकारक गोलंदाजी. संघाचं संतुलन पूर्णपणे बिघडलं आणि परिणामी पाकिस्तानचा प्रवास ‘विजयाविना’ संपला. चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून, संघाच्या रणनीती आणि व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा -

Ind vs Aus Live Score 3rd ODI : रोहित-विराटचा ऑस्ट्रेलियातला शेवटचा सामना, इज्जत वाचवण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, किती वाजता रंगणार मॅच?