On This Day: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अजूनही उत्कृष्ट कर्णधाराच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. यामागचं कारणही तितकचं खास आहे, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं अनेक यशाचे शिखर गाठलंय. दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. 


महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अशी काही कामगिरी केली आहे जी जगातील अन्य कोणत्याही संघाला जमली नाही. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.  आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या तिनही स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.


भारतासमोर 130 धावांचं लक्ष्य रोखण्याचं आव्हान
या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 50 षटका ऐवजी 20 षटकाचा खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 129 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक 43, रविंद्र जाडेजानं नाबाद 33 तर, शिखर धवननं 31 धावांची खेळी केली. 20 षटकात 130 धावांचे आव्हान काहीच नव्हते.


भारताचा पाच धावांनी विजय
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघानं 8 षटकात 46 धावांवर चार विकेट्स गमावले. अ‍ॅलिस्टर कुक, जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि जो रूट स्वस्तात माघारी परतले. त्यांनतर इयन मॉर्गन आणि बोपारानं डाव सावरत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना मॉर्गननं 33 आणि बोपारानं 30 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंडचा संघ धक्क्यातून सावरू शकला नाही आणि पाच धावांनी सामना गमावला.


आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार
या विजयासह धोनी क्रिकेट आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. शिखर धवनला प्लेअर ऑफ द सिरीज निवडलं गेलं. तर, रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.


हे देखील वाचा-