Gautam Gambhir On MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या सर्व प्रकारच्या चषक जिंकले आहेत.  2011 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये धोनीने षटकार मारत टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिला होता. विश्वचषक विजेत्या संघातील गौतम गंभीर याने याबाबत वारंवार वक्तव्य करत वाद ओढावला होता. धोनीच्या फक्त षटकारामुळेच आपण विश्वचषक जिंकला नाही, संपूर्ण संघाला क्रेडिट दिले पाहिजे, असे गौतम गंभीर म्हणाला होता. गंभीर याच्या या वक्तव्यानंतर टीकास्त्र सोडले होते. पण आता गौतम गंभीरने आता धोनीचे कौतुक केलेय.  


गौतम गंभीरने धोनीबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.  गंभीरने माजी कर्णधाराचे कौतुक केले आहे. धोनीने टीमच्या विजयासाठी आणि चषकासाठी आंतरराष्ट्रीय धावांचे बलिदान दिल्याचे गंभीर म्हणाला. माजी फलंदाज म्हणाला की, धोनी त्याच्या कारकिर्दीत अधिक धावा करू शकला असता, परंतु त्याने संघाला स्वतःच्या पुढे ठेवले. त्यामुळेच भारतीय संघ इतका यशस्वी ठरला. 


गौतम गंभीर याने ‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना धोनेचे कौतुक केले. गंभीर म्हणाला की,  “एम एस धोनीने संघासाठी आणि ट्रॉफीसाठी आंतरराष्ट्रीय धावांचे बलिदान दिले. जर तो कर्णधार नसता तर तो भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झाला असता. तिसऱ्या क्रमांकावर धोनीने अधिक धावा केल्या असल्या.  पण त्याने संघाला पुढे ठेवत त्याच्यातील फलंदाजाचा त्याग केला.” 






धोनीच्या नेतृत्वात अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकली -  


मागील दहा वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसीचा चषक उंचावता आला नाही. धोनीच्या नेतृत्वात भारताने अखेरची आय़सीसी स्पर्धा जिंकली होती. २०१३ पासून भारताला विजय मिळाला नाही. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारताला फक्त आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.


२०११ मध्ये भारतात झालेला विश्वचषक धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकला होता. यंदाचा विश्वचषक भारतात होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जेतेपदाची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. आता विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संघाला विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जातेय.