ODI World Cup 2023, IND Vs NZ : नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात पडला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले आहे. भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दव लवकर येत असल्यामुळे रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत. आतापर्यंत हे दोन्ही संघ अजेय राहिलेत. रविवारी जो संघ बाजी मारेल तो उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल. कारण या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या 10 संघांना राउंड रॉबिन सामन्यांमध्ये 9-9 सामने खेळायचे आहेत.  याआधीचा इतिहास पाहिला तर 5 किंवा 6 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याशिवाय या दोन्ही संघाचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. 


भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. त्याशिवाय शार्दूल ठाकूर याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शामी यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. दोघेही यंदाच्या विश्वचषकात प्रथम मैदानात उतरणार आहेत.


भारताची  प्लेईंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


न्यूझीलंडची प्लेईंग 11: डेवोन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लेथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिशेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट



हेड टू हेड आकडे काय सांगतात ?


विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागल नव्हता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 1975 च्या विश्वचषकात झाला होता. तर अखेरचा सामना 2019 मध्ये झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. भारताने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचे 2003 मध्ये पराभूत केले होते. 


वनडेतील आकडेवारी काय - 


वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडला 50 सामन्यात विजय मिळाला आहे. सात सामन्याचा निकाल लागला नाही. आता रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


भारतीय संघ दमदार फॉर्मात


विश्वचषकात भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारतीय संघाने सलग चार सामन्यात विजय मिळत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा पराभव करत चार गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ या स्पर्धेत अजेय आहेत. इतर आठ संघांना पराभवाचा सामना करावा लागला. आता नंबर एक आणि नंबर दोन यांच्यामध्ये सामना होणार आहे. विजेता संघ गुणातालिकेत अव्वल स्थान पटकावेल.