Yashasvi Jaiswal: आयपीएल स्टार आणि भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बॅटनं धुमाकूळ घालताना दिसत आहे. मुंबईकडून खेळताना त्यानं उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध शतक झळकावलंय. मात्र, या शतकासाठी यशस्वीला खेळपट्टीवर खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर या सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालनं तब्बल 54 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव काढली. ज्यानंतर स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या सहकारी खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट केला.


यशस्वी जैस्वालच्या पहिल्या धावेनंतर मैदानात टाळ्यांचा कडकडाट
या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वालनं 227 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात यशस्वीला खातं उघडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. कसोटी फॉरमॅटमध्ये यशस्वीनं दुसऱ्या डावात 53 चेंडूपर्यंत एकही धाव काढली नाही. यानंतर 54 व्या चेंडूवर चौकार मारून त्यानं आपलं खातं उघडलं आहे.  यशस्वीनं चौकार मारताच त्याच्या सहकारी खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट केलाय. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या यशस्वीनं सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 114 चेंडूत 35 धावा केल्या. म्हणजेच 53 चेंडूपर्यंत खातेही उघडू न शकलेल्या यशस्वीनं पुढच्या 61 चेंडूत 35 धावा केल्या.



मुंबईला 346 धावांची आघाडी
या सामन्यात मुंबईने प्रथम 393 धावा केल्या होत्या. यात यशस्वीच्या शतकाचा मोठा वाटा होता. त्याच्याशिवाय हार्दिक तोमरनेही 115 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ 180 धावांवर ढेपाळला. यानंतर दुसऱ्या डावातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईनं एक विकेट्स गमावून 133 धावा केल्या.  या सामन्यात मुंबईच्या संघाला 346 धावांची आघाडी मिळालीय. 


हे देखील वाचा-