IND vs NZ, 2nd Test Match: भारत आणि न्यूजीलंड यांच्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडिएमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीनं पुनरागमन केलं आहे. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टॉम लेथम न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करत आहे. योगायोगानं दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार पाहायला मिळाले. यापूर्वी  132 वर्षांपूर्वी दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार झाले होते.


दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल झाले. अंजिक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीमुळे बाहेर बसला. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्य़ा कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची धुरा टॉम लेथमकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 132 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.


1889 मध्येही दोन कसोटी मालिकेत चार कर्णधार -
1889 मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये दोन सामन्यात चार कर्णधार झाले होते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत चार कर्णधार झाले होते.  दक्षिण अफ्रीकाकडून ओवेन डुनेल आणि विलियम मिल्टन कर्णधार झाले होते. तर इंग्लंडकडून ऑब्रे स्मिथ आणि माँटी वोडेनहुई यांनी कर्णधारपद सांभाळलं होतं. दोन सामन्यात चार कर्णधार होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आता 2021 मध्ये अशी घटना घडली आहे.


 







मयांकची शतकी खेळी - 
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने (Mayank Agarwal) टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलने (Ajaz Patel) चमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत. सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.