क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये 2007 साली शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. 3 कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमध्ये एकही सामना झाला नाही. 


आता क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने रोहित शर्माला विचारले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमितपणे क्रिकेट सामने खेळले गेले तर कसे होईल? दोघांमध्ये कुठेही सामना खेळला जात असला तरी, भारत-पाकिस्तान कसोटी सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतो, असंही वॉन म्हणाला.


रोहितने काय प्रत्युत्तर दिले?


माझा विश्वास आहे की त्यांचा संघ चांगला आहे, त्यांची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. खासकरून जर परदेशी मैदानावर खेळला गेला तर आमचा चुरशीचा सामना होईल. माझ्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा कसोटी सामना कदाचित 2006 किंवा 2007 मध्ये असेल. शेवटी आम्हाला क्रिकेट खेळायचे आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून भारत आणि पाकिस्तानमधील कसोटी सामना जबरदस्त होईल. परंतु मी इतर कोणत्याही विषयावर भाष्य करणार नाही. आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असतो. मी केवळ क्रिकेटच्या दृष्टीने पाहतोय. ही शानदार लढत होणार असेल, तर का शक्य नाही!' या प्रकरणावर याआधीच 'बीसीसीआय'ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


भारत-पाकिस्तानचा शेवटचा सामना कधी झाला होता?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. विश्वचषकाच्या गट टप्प्यातील त्या सामन्यात पाकिस्तानी संघ प्रथम खेळताना केवळ 192 धावांवरच मर्यादित राहिला. तर भारताने जवळपास 20 षटके बाकी असताना 7 विकेट्सने सामना जिंकला. आता दोन्ही संघ T20 विश्वचषक 2024 मध्ये आमनेसामने येणार आहेत कारण दोन्ही संघांना अ गटात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 9 जून रोजी होणार आहे.


ऋषभ पंतबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?


ऋषभ पंतला लहानपणापासून पाहतोय, तो अपघातानंतर पुन्हा क्रिकेट खेळतोय हे पाहून आनंद होतो. रिषभ पंत ज्यावेळी माझ्याकडे येतो त्यावेळी हसवत असतो असं रोहित शर्मा म्हणाला. ज्यावेळी मला हसायचं असेल त्यावेळी ऋषभ पंतला बोलावतो, असं रोहितनं सांगितलं. रोहित शर्मासोबत या पॉडकास्टमध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि मायकल वॉन देखील सहभागी झाले होते. गिलख्रिस्ट आणि रोहित शर्मा यांनी 2009 चं आयपीएल डेक्कन चार्जर्सला जिंकवून दिलं होतं. गिलख्रिस्ट त्यावेळी कॅप्टन होता तर रोहित शर्मा उपकर्णधार होता.  


संबंधित बातम्या:


शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video


 टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा