ICC T20 World Cup 2024 : यंदा एकदिवसीय विश्वचषक होणार असून 2024 म्हणजेच पुढील वर्षी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी20 विश्वचषक (T20 WC) खेळवला जाईल. ही नववी टी-२० विश्वचषक स्पर्धा असणार आहे. या विश्वचषकात पात्र होण्यासाठी 24 संघांमध्ये सामने होणार असून 20 पात्र संघांना 5 गटात विभागले जाणार आहे. त्यांच्या गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरतील. तर या आगामी टी-20 विश्‍वचषक 2024 च्‍या तारीख, वेळापत्रक, ठिकाण आणि पात्र संघांबद्दल जाणून घेऊ...


2024 मध्ये खेळला जाणारा हा टी20 विश्वचषक युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाईल. हा विश्वचषक जून आणि जुलै 2024 मध्ये खेळवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) आतापर्यंत इतकीच माहिती या विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल समोर आणली आहे. दरम्यान या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक आणि वेळेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण हे नक्की आहे की 2024 च्या T20 विश्वचषकात होणारे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जातील. आगामी विश्वचषकात एकूण 45 सामने होणार असून त्यातील एक तृतीयांश सामने अमेरिकेत आणि बाकीचे वेस्टइंडिजमध्ये खेळवले जातील.


कोणते आहेत पात्र संघ?


ICC T20 क्रमवारीतील अव्वल-10 संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. यानंतर पात्र संघ या विश्वचषकाचा भाग असतील. सध्या भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. हे सर्व संघ आयसीसी टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. याशिवाय उर्वरित पात्रता संघ या विश्वचषकात खेळणार आहेत.


इंग्लंड आहे सध्याचा चॅम्पियन


सध्या इंग्लंड संघ टी-20 विश्वचषक विजेता आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. याआधी 2010 साली वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यात इंग्लंड संघाला यश आले होते.


महिला संघाचा टी-20 विश्वचषक हुकला


नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ थोडक्यात विजयापासून हुकला. सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं. अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. तर पुन्हा एकदा उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात आठ बाद 167 पर्यंत पोहचू शकला. भारतीय फलंदाजांनी ठरावीक अंतराने आपल्या विकेट फेकल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी जबरदस्त फिल्डिंग केली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हती. 


हे देखील वाचा-