Rishabh Pant : दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील पाच सामन्याच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये आज पहिला टी 20 सामना रंगलाय. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलेय. मालिकेपूर्वी राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे कर्णधारपदाची माळ 24 वर्षीय ऋषभ पंतच्या गळ्यात पडली..  हा तोच पंत आहे, ज्याचं दोन वर्षांपूर्वी भारतीय संघातील स्थान पक्कं नव्हते.. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ऋषभ पंतचं नशीबचं बदलले.. पंत भारतीय संघाचा नियमीत सदस्य झाला.. त्यानंतर आता त्याच्याकडे भारतीय संघाची धुराही सोपवण्यात आली. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पंत भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्येही नव्हता.. तो बेंचवर होता.. पाहूयात त्यावेळी काय झाले होते..?


कर्णधारपद मिळाल्यानंतर पंत काय म्हणाला?
बीसीसीआयसह ज्यांनी ज्यांनी आजवर सपोर्ट केला त्या साऱ्यांचे ऋषभ पंतने सर्वात आधी आभार मानले. तसंच ''ही जबाबदारी फार चांगल्या परिस्थितीत आलेली नाही, पण संधी मिळाल्यामुळे फार भारी वाटतंय'' असंही पंत म्हणाला. तसंच या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. संघाला आणि स्वत:ला एका चांगल्या पोजिशनवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असंही पंत म्हणाला. 


एडलेड कसोटीत भारतीय संघातही नव्हता - 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत भारताच्या प्लेईंग 11 मध्येही नव्हता... पंत त्यावेळी एकदिवसीय आणि टी 20 मध्येही नव्हता. पण नंतर जे झाले ते सर्वांनीच पाहिलं. पिंक बॉल कसोटी वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाला.. त्यानंतर ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले.. पंतने या संधीचं सोनं केलं. ऑस्ट्रेलियात भारताच्या एतिहासिक विजयात पंतचा सिंहाचा वाटा होता.  


सिडनी आणि ब्रिसबेनमध्ये पंतची जादू -  
मेलबर्न कसोटीत पंत संघर्ष करताना पाहायाला मिळाले होते. त्याला 40  चेंडूत फक्त 29 धावा करता आल्या होत्या. पण सिडनी कसोटी पंतने 97 धावांची मोठी खेळी केली. तसेच ब्रिसबेन कसोटीत आक्रमक 89 धावांचा पाऊस पाडला. पंतच्या नाबाद खेळीच्या बळावर भारताने तीन विकेटने ब्रिसबेन कसोटी जिंकली. भारतीय संघाच्या 2-1 च्या विजयात पंतचा मोलाचा वाटा होता. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सर्वात मोठं कमकॅब म्हणून ओळखलं जाऊ लागले.  


ऐतिहासिक विजयात पंतची मोलाची भूमिका -  
पहिल्या कसोटीत संघात स्थानही नसणाऱ्या पंतने मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली. पंतने त्या मालिकेतील पाच डावात 68.50 च्या सरासरीने 274  धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा पंतच्या करिअरचा टर्निंग पॉईंट म्हटल्यास वावगे वाटायला नको. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ऋषभ पंतने मागे वळून पाहिले नाही. आयपीएलमध्ये दिल्लीचं कर्णधारपद सांभाळले, त्यानंतर आता भारतीय संघाची धुरा त्याच्याकडे आली आहे.