India vs South Africa 1st T20I : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच पाच सामन्याच्या मालिकेत कोरोना महामारीचा शिरकाव झालाय. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करमला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मधून त्याला वगळण्यात आलेय.


मार्करम कोरोना पॉजिटिव टेम्बा बावुमाने नाणेफेकीवेळी सांगितले की, एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या टी 20 सामन्यातून बाहेर गेलाय. मालिकेतील पहिल्या सामन्यातच खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. तसेच या मालिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. दोन्ही संघ तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत या मालिकेसाठी बीसीसीआयने बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पहिल्याच सामन्याआधी खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरु आहे. 


भारतीय संघाची आजची प्लेईंग 11 पुढील प्रमाणे -
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल


दक्षिण आफ्रिका संघाची आजची प्लेईंग 11 पुढील प्रमाणे -
क्विंटोन डी कॉक, टेम्बा बावुमा, रस्सी वान डेर डुसेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरिअस, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, ऑनरीच नॉर्टजे, तबरेज शम्सी 






 Head to Head, कोण सरस?



भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.