Team India T20 World Cup 2024 Celebration : विश्वविजेत्या (T20 World Cup 2024) टीम इंडियाचं (Team India) आज मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघासाठी आज मुंबईत विजयी परेड पार पडत आहे. मरीन ड्राईव्ह पासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत ही विजयी यात्रा  डबल डेकर ओपन बसमधून पार पडणार आहे. यासाठी क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दाखल झाले आहेत. महत्वाचं म्हणजे आयपीएलवेळी ज्या मैदानावर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीकेचा धनी झाला होता. पांड्यासाठी छपरी-छपरीच्या घोषणा झाल्या होत्या, त्याच मैदानावर आता हार्दिक पांड्याचा जयघोष पाहायला मिळत आहे. 


ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा


भारताने 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांचं मोलाचं योगदान आहे. शेवटच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडत विश्वचषक हिसकावून आणला. भारतीय संघाच्या या विजयी कामगिरीत हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता. विश्वचषकातील शेवटची ओव्हर हार्दिकने टाकली होती. या षटकात दक्षिण आफ्रिकेा 16 धावांची गरज होती, पण संघाला आठ धावाच काढता आल्या आणि भारताने विश्वचषक जिंकला.


त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष


आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यावर खूप टीका झाली. मात्र, त्याचं हार्दिक पांड्याला आता सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते दाखल झाले आहेत. टीम इंडियाला पाहण्यासाठी आलेले चाहते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नावाचाही जोरदार जयघोष सुरु आहे. आयपीएलमध्ये याच वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यासाठी छपरी-छपरी अशी घोषणाबाजी करत त्याच्यावर टीका करण्यात आली होती. त्याच मैदानावर आता चाहते, त्याचा जयघोष करत आहेत.


पाहा व्हिडीओ : वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष






हार्दिक पांड्याला अश्रू अनावर


विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं होतं. विजयावर बोलताना हार्दिक म्हणाला होता की, ''गेल्या सहा महिन्यात मला जो त्रास झाला, पण मी रडलो नाही, कारण माझ्या दु:खात आनंदी होणाऱ्यांना मला आनंद द्यायला नव्हता. देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं होतं. शेवटची ओव्हर मला मिळाली. माझ्यावर दबाव नव्हता, कारण मला स्वत:वर विश्वास होता आणि आम्ही जिंकलो.'' हे सांगताना मात्र हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले आहेत.


हार्दिक पांड्याचं ट्रोलर्सला उत्तर


विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी झाल्या. पत्नी नताशासोबत घटस्फोटाच्या चर्चा होत्या. त्यातच मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावरून टीका झाली. इतकंच काय तर टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्यावरही टीकाकारांनी त्याला सोडलं नाही. पण, हार्दिकने त्याच्या खेळीने टीकाकारांना दाखवून दिलं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने मागील सहा महिन्यांपासून अडवलेला अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तो म्हणाला होता, 'जे मला एक टक्केही ओळखत नाहीत, त्यांनी खूप टीका केली. पण, आज मी खूश आहे आणि तेही नक्कीच खूश असतील.'