Harbhajan Singh Picks Team India For T20 WC :  हार्दिक पांड्याला यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय. नेतृत्वातही हार्दिक पांड्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला विश्वचषकाच्या संघात स्तान मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यांनी टी 20 विश्वचषकासाठी आपल्या 15 जणांच्या शिलेदाराची निवड केली आहे. हरभजन सिंह यानं आपल्या विश्वचषकाच्या संघात हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. भज्जीने सलामी फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांना निवडलेय. 


भज्जीने आपल्या ताफ्यामध्ये मोहम्मद सिराज, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल आणि शुभमन गिल यांना संधी दिली नाही. हरभजन सिंह यानं निवडलेल्या संघाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


भज्जीनं कोणत्या खेळाडूंवर दाखवला विश्वास 


भज्जीने आपल्या संघात विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर निवडलेय. त्यानंतर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह आणि संजू सैमसन यांच्यावरही विश्वास दाखवलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून भज्जीने शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा यांची निवड केली आहे.  कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंना स्थान दिलेय. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमारहच्या खांद्यावर आहे. त्याच्या जोडीला आवेश खान, अर्शदीप सिंह आणि मयंक यादव यांना निवडलेय. 
टी20 वर्ल्ड कपसाठी हरभजन सिंहनं निवडलेला संघ, कुणाला मिळाली संधी ?


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह, संजू समसन, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि मयंक यादव.






दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाचे 15 शिलेदार निवडले जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 किंवा 30 एप्रिल रोजी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी 20 विश्वचषकात उतरणार आहे. 2 जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ पाच जून रोजी पहिला सामना आयर्लंडविरोधात खेळणार आहे. पाकिस्तानसोबत टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी होणार आहे.