India vs Pakistan Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप 2025 ला धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारताने यूएईवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अवघ्या 58 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने फक्त 4.3 षटकांत गाठत इतिहास रचला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा हा सर्वात जलद विजय ठरला. कुलदीप यादवच्या फिरकीने यूएईच्या फलंदाजांची अक्षरशः वाट लावली. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ पाहून पाकिस्तानचे डोकेदुखी वाढली असणार, कारण भारताचा पुढील सामना पाकिस्तानशीच आहे.

Continues below advertisement

यूएईची सुरुवात चांगली, पण कुलदीपसमोर हतबल

टॉस हरल्यानंतर यूएईने फलंदाजीला सुरुवात केली. सलामीवीर अलीशान शरफू (22) आणि कर्णधार मुहम्मद वसीम (19) यांनी पहिल्या गड्यासाठी 26 धावांची भागीदारी दिली. जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडली आणि त्यानंतर यूएईचा डाव डगमगला. मधल्या फळीत कुलदीप यादवने अक्षरशः धुमाकूळ घातला. या जोडीव्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज 5 धावांचाही टप्पा ओलांडू शकला नाही.

Continues below advertisement

कुलदीप यादवचा धुमाकूळ

कुलदीप यादवने नवव्या षटकात एकाच ओव्हरमध्ये तीन गडी बाद करून सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. राहुल चोप्राला झेलबाद, वसीमला एलबीडब्ल्यू आणि हर्षित कौशिकला बोल्ड करत त्याने यूएई संघाचे कंबरडे मोडले. एकूण 2.1 षटकांत फक्त 7 धावा देत 4 बळी टिपत त्यांनी ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मान मिळवला. 

सामना संपल्यानंतर कुलदीप यादव काय म्हणाला?

कुलदीप म्हणाला की, “गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर मला खेळायला मिळालं नाही. तेव्हा थोडं वाईट वाटलं, पण मी माझ्या गोलंदाजीवर आणि फिटनेसवर काम करत राहिलो. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांचा अभ्यास करून गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे.”

पाकिस्तानमध्ये वाढलं टेन्शन!

भारताचा पुढचा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दुबईत भारताने मिळवलेला इतका मोठा विजय पाहून पाकिस्तानच्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अलीकडेच यूएईने पाकिस्तानविरुद्ध खेळलं होतं, पण तिथे पाकिस्तानी गोलंदाजांना अशी भेदक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहविरुद्ध सुरुवातीला सावध राहिलं तरी मधल्या फळीत कुलदीप यादवविरुद्ध कशी लढाई द्यायची हा पाकिस्तानसमोरचा मोठा प्रश्न आहे.

पहलगाव हल्ल्यानंतर भारताचा रोष

पहलगाव हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी भावना प्रचंड उसळल्या आहेत. काही काळ हा सामना रद्द होईल अशी चर्चा होती, मात्र आता भारतीय खेळाडू मैदानावरच आपला रोष पाकिस्तानविरुद्ध उतरवतील. पाकिस्तानचा पुढचा सामना शुक्रवारी ओमानशी असून त्यानंतरच 14 सप्टेंबरला भारताशी त्यांची थेट भिडंत होईल.

हे ही वाचा -

Supreme Court on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार, 'ती' याचिका फेटाळली