कोलकाता: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


2021 साली भारतात होणारी वन डे सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करून, आयसीसीनं त्याऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक पाहायला मिळेल.

वन डेचा विश्वचषक असताना आठ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची गरज आहे का, असा प्रश्न सातत्यानं विचारण्यात येत होता. त्या प्रश्नाला अखेर आयसीसीनं कोलकात्यातल्या बैठकीत एकमतानं उत्तर दिलं आहे.

आठ संघांमधल्या वन डे सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आयसीसीनं 2021 साली सोळा संघांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा पर्याय निश्चित केला आहे.

त्यामुळं आता 2020 साली ऑस्ट्रेलियात आणि 2021 साली भारतात लागोपाठ दोन ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांचं आयोजन होईल.

आयसीसी बोर्डाची 5 दिवसीय बैठक कोलकात्यात पार पडली. या बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितलं की, आयसीसीने सर्वानुमते 2021 मध्ये भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी 16 संघांचा समावेश असणाऱ्या टी ट्वेण्टी मालिकेचं आयोजन करण्यात येईल.

दरम्यान, सुरुवातील भारताने या निर्णयाला विरोध केला होता, मात्र नंतर बीसीसीआयचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी समर्थन केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानकडे

2017 मध्ये  झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानने दारुण पराभव केला. पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली होती. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.  पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

संबंधित बातम्या

IndvsPak Final CT 2017: पाकला चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद