आगरताळा: भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


‘मिस वर्ल्ड’ अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स’ होता, असं म्हणत विप्लव देव यांनी ऐश्वर्या रायचं कौतुक केलं.

डायनाचं सौंदर्य न समजण्यापलिकडे

“आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणे मानतो. ऐश्वर्या राय भारतीय महिलांचं प्रतिनिधीत्व करते. ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली ते योग्य आहे, मात्र 21 वर्षापूर्वी डायना हेडन कशी काय मिस वर्ल्ड बनली, हे समजण्या पलिकडे आहे”, असं विप्लव देव म्हणाले.

कॉस्मेटिक माफियांची भारतावर नजर

“कॉस्मेटिक माफियांची भारतावर नजर आहे. सलग पाच वर्ष आम्ही ‘मिस वर्ल्ड’ किंवा ‘मिस युनिव्हर्स’ किताब जिंकले. ज्यांनी ज्यांनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, त्यांनी त्यांनी किताब पटकावले. डायना हेडनही जिंकली. मात्र खरंच ती किताबास पात्र होती का?” असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला.

पाच वर्षानंतर भारतात एकही सौंदर्यवती का तयार झाली नाही? कारण माफियांनी भारताच्या मार्केटवर कब्जा केला आहे, असं विप्लव देव म्हणाले.

ट्विटरवर ट्रोल

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या या वक्तव्यानंतर, ट्विटराईट्सनी चांगलाच समाचार घेतला. सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी हे वक्तव्य ‘मूर्खपणाचं, कामुक आणि धार्मिक’ असल्याचं म्हटलं.

विप्लव देव यांचं यापूर्वीचं वक्तव्य 

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी यापूर्वीही अजब वक्तव्य केलं होतं. भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं ते म्हणाले होते. अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश नाही, तर भारतानेच हजारो वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लावला होता, असं ते म्हणाले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केलं. ''महाभारतात काय होत होतं, हे संजयने धृतराष्ट्रला सर्व सांगितलं. म्हणजेच त्यावेळी इंटरनेट होतं, सॅटेलाईट होतं आणि तंत्रज्ञानही होतं. त्या काळातही आपल्या देशात तंत्रज्ञान होतं,'' असं विप्लव देव म्हणाले.

संबंधित बातम्या

महाभारतातही इंटरनेटचा वापर झाला होता : विप्लव देव