आयसीसी महिला विश्वचषक: ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2017 12:01 AM (IST)
सौजन्य: ICC (TWITTER)
ब्रिस्टोल (इंग्लंड): सलामीच्या पूनम राऊतनं शतक झळकावूनही, भारतीय महिलांना विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून आठ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. मेग लॅनिंग आणि एलिस पेरी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याआधी, या सामन्यात भारताच्या पूनम राऊतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची मोठी भागीदारी रचली त्यात मिताली राजचा वाटा होता 69 धावांचा. पूनमनं 136 चेंडूंत 11 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तिचं हे वन डे कारकीर्दीतलं दुसरं शतक ठरलं. पूनम आणि मिताली बाद झाल्यावर भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. भारताला 50 षटकांत सात बाद 226 धावांचीच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियानं 8 गडी आणि 29 चेंडू राखून भारतावर सहज विजय मिळवला. संबंधित बातम्या: मुंबईकर पूनम राऊतचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक