मुंबई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं चीनचा 9-0 असा धुव्वा उडवला. चीनवर मात करत भारताने उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म केलं आहे. त्याचप्रमाणे भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.


कुआन्तानमध्ये आलेल्या पावसामुळे हा सामना उशिरानं सुरु झाला होता. मग भारतीय संघानेही गोल्सची बरसात केली आणि चीनच्या बचावाच्या चिंधड्या उडवल्या. भारताकडून आकाशदीप सिंगनं नवव्या आणि 39व्या मिनिटाला गोल केले. अफ्फान युसूफनं 19व्या आणि 40व्या मिनिटाला गोल्सची नोंद केली तर जसजीत सिंग खुल्लरनं 22व्या आणि 51व्या मिनिटाला गोल डागले.

रुपिंदर पाल सिंग, निकिन तिमय्या आणि ललित उपाध्यायनंही प्रत्येकी एक गोल डागला. भारताचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. या विजयासह भारताच्या खात्यात दहा गुण जमा झाले असून, भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेशही निश्चित झाला आहे.