अहमदनगर : अहमदनगर जिल्हातल्या पाथर्डीत निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महादेव शिंदे हे जखमी झाले आहेत. रांगेत उभं राहण्यास सांगितल्यानं पोलिसाला खाली पाडून जमावानं बेदम मारहाण केली आहे.


अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. पाथर्डीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान सुरु होतं. त्यावेळी मतदान टेबलाजवळील गर्दीला रांगेत उभे राहण्यास सांगितल्यानं वाद झाला होता. वादानंतर गर्दीतील अज्ञातानं शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया :

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं स्पष्ट केलं आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आदेश आपण दिले आहेत आणि फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे, जर कुणी या तपासावेळी विलंब केला तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल असं केसरकर म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांची सरकारवर टीका :

दरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला कात्रीत पकडलं आहे. अशाप्रकारे सतत व्हायला लागलं तर कायदा व सुव्यवस्था कोण राखणार? त्यामुळे सरकारनं आत्मपरिक्षण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तसंच अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलिसांचं अध:पतन होत आहे. या प्रकरणी सरकारचं अपयश आहे. सरकारला याचं विशेष गांभीर्य नाही. मताचं राजकारण याची प्रवृत्ती वाढली असल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.