मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही अनिल कुंबळेच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असेल, असं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच विंडीज दौऱ्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण याचा निर्णय बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीच घेईल, यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केलं.


बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीची जबाबदारी गेल्या वर्षी क्रिकेट सल्लागार समितीवर सोपवली होती. त्यांनी अनिल कुंबळेची एका वर्षासाठी नियुक्ती केली. भारतीय संघाचा नवा प्रशिक्षकही त्याच प्रक्रियेनुसार निवडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी थोडा उशीर झाल्यानं नव्या प्रशिक्षकाच्या निवडीलाही थोडा विलंब होणार आहे.

तोवर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच राहिल, असं विनोद राय यांनी स्पष्ट केलं. टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्याला 23 जूनपासून सुरुवात होत असून, या दौऱ्यात भारतीय संघ पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेत खेळणार आहे.